Thursday, December 9, 2021

पुस्तकाचे नांव--भूतान एक आनंदयात्रा

वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य
 परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई
 पुस्तक क्रमांक-८६
 पुस्तकाचे नांव--भूतान एक आनंदयात्रा.....
 लेखकाचे नांव--राजेंद्र वाकडे
प्रकाशक-श्रीशैल्य प्रकाशन, तारळे,पाटण
प्रकाशन वर्ष व आवृत्ती- मे २०२१/प्रथमावृत्ती
एकूण पृष्ठ संख्या-१५१
वाङमय प्रकार ----प्रवासवर्णन 
मूल्य--१५०₹
📖📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
८६||पुस्तक परिचय
भूतान एक आनंदयात्रा
लेखक-राजेंद्र वाकडे
****************************************
सातारा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदारआणि सिक्किमचे भूतपूर्व महामहिम राज्यपाल आदरणीय माननीय श्रीनिवास पाटील साहेब यांचा शुभसंदेश 'भूतान…. एक आनंदयात्रा'या प्रवासवर्णनपर भ्रमणगाथेला लाभलेला आहे. "लेखक आणि भ्रमंतीकार श्री राजेन्द्र वाकडे यांचे निसर्ग ,पर्यावरण व हिमालयावर असणारे प्रेम आनंदयात्रेचे वाचन करताना पानोपानी दिसून येते. सैनिकांविषयी असणारी आत्मियता आणि अनुभव वाचताना अंगावर रोमांच उभे राहतात.सुक्ष्मपणे स्थळांचे निरीक्षण करून त्यावर चिंतन- मनन करून प्रवासातील त्यांच्या सहलीचे अनुभव मांडले आहेत." 

'कलकत्ता-दार्जिलिंग-सिक्किमसह भूतान एक  आनंदयात्रा' या पुस्तकातील त्यांचे अनुभव  यापूर्वी लॉकडाऊनच्या काळात आम्हाला वाचनाची मेजवानी मिळाली होती. व्हाटसअप समूहावर त्यांनी दररोज लेखमालिका प्रसिद्ध करून आम्हा समस्त मित्रपरिवाराला घरबसल्या सहल घडवून आणली होती.ती यथार्थ,समर्पक शब्दांची पखरण करुन बहारदारपणे खुलविलेल्या लेखामालिकेतून. वाचताना प्रत्यक्ष भेटीची अनुभूती मिळत होती. अक्षरशः अप्रतिम शब्दसाजात त्यांनी क्रमशः लेखमालिका गुंफली होती.पुढील भाग वाचण्याचे कुतूहल निर्माण व्हायचे.इतकं दमदार प्रवासवर्णन केलेलं होतं.स्वत:फिरणं आणि त्याचं लेखन वास्तवपणे करणं तसं जिकरिचं आणि कठीण काम असतं.पण हे शिवधनुष्य त्यांनी लीलया पेलले.त्यांच्या खुमासदार शैलीमुळे त्यांचा खास चाहतावर्ग लॉकडाऊनच्या काळात विस्ताराने संवर्धित झाला.त्यांची आणि माझी ओळख नावापुरती मर्यादीत होती ती लॉकडाऊनच्या काळात प्रवासवर्णाच्या लेखामुळे तिचा परीघ वाढला.तसेच मी केलेल्या 'साठवणीतल्या आठवणींचे' प्रवासवर्णन ग्रुपवर शेअर करीत होतो.त्याचे त्यांनी अनेकदा फोन वरुन माझ्याशी संवाद साधून कौतुक केले आहे. शुभसंदेशात सदिच्छा दिल्या,आणि लिहिते हात सदैव ठेवण्याचीआत्मप्रेरणा दिली.

लेखक व भ्रमंतीकार  श्री.राजेंद्र  वाकडे बहुआयामी प्राथमिक शिक्षक आहेत. कथा- कविता लेखन, कथाकथन हा त्यांचा छंद असून, सूत्रसंचालन हा त्यांचा आवडीचा व्यासंग आहे.निसर्ग पर्यटनाची व भटकंतीची त्यांना आवड आहे.काही काळ त्यांनी दैनिक सकाळ आणि पुढारी वृत्तसेवेत पत्रकारिता केलेली आहे.शिक्षण आणि शिक्षकांचा दर्पण म्हणून लौकिक असलेल्या 'जीवन शिक्षण' मासिकात त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. ते उपक्रमशील शिक्षक असून त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव तालुकास्तरीय 'आदर्श शिक्षक पुरस्काराने'झालेला आहे. आयडियल टिचर्स अकॅडमीचे ते क्रियाशील सदस्य आहेत.

योगायोगाने १०नोव्हेंबर रोजी एका धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने फलटण येथे गेलो होतो.तिथं आमचे साहित्यिक शिक्षकमित्र श्री गणेश तांबे यांच्या भेटीला गेलो असता, सौ.व श्री राजेन्द्र वाकडे सरांची भेट झाली.यापुर्वी आभासी माध्यमातून झालेला संवाद तिथं प्रत्यक्ष भेटीतून हितगुज केले.हॉटेल अशोकात कॉफी-पे एकमेकांच्या पुस्तकांची चर्चा करीत, कॉफीचा आस्वाद घेतला.'लव- फलटण'सेल्फिपॉईंटवर पुस्तकांची स्नेह भेट एकमेकांना दिली.मोबाईलमध्ये ती आठवण भेट टिपली.

भ्रमणगाथेतील आनंदयात्रीचे साक्षीदार असणाऱ्या मित्रवर्य व उपक्रमशील शिक्षक, छांदिष्ट व जय गुरुदेव व इतर समूहातील मित्रांनी आणि हितचिंतकांनी केलेल्या प्रेमळ सूचनेतून या प्रवासवर्णनाची लेखमालिका 'भूतान एक आनंदयात्रा' आवृत्ती त्यांनी रसिक वाचकांना लोकार्पण केली आहे. दिमाखदार सोहळ्यात'भूतान एक आनंदयात्रा ' या भ्रमण गाथेचा प्रकाशन सोहळा साहित्यिकांच्या मांदियाळीत, विविध मान्यवरांच्या शुभहस्ते, आनंदयात्रीचे सहप्रवासी आणि हितचिंतकांच्या समवेत संपन्न झाला होता.माझे डी.एड.चे वर्गमित्र आदरणीय दीपक भुजबळ बापू यांनी राजेंद्र बोबडे लिखित 'भूतान एक आनंदयात्रा' हे प्रवासवर्णनपर हे पुस्तक १२ सप्टेंबरला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने भेट दिले होते.

लेखमालिकेत स्थळ काळाचे वर्णन ओघवत्या व प्रवाहीशैलीत केले आहे.सहज साध्या सोप्या  भाषेत केलेले लेखन वाचताना कुतूहल वाढतच जाते. त्यांचे सर्वच लेखन वाचनीय ठरले होते.व्हाटस अप समूहातील  वाचक मित्रांनी अगोदरच पसंतीची मोहोर उमटवली होती.
"बोलणे असो वा लिहिणे असो, जेंव्हा ते अंत:करणापासून व्यक्त करावेसे वाटते, तेंव्हाच ते अमृतमय होते.आनंदमय होते. हेच या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे,की लेखकाने अनुभवलेला प्रांत आणि आसमंत,आपणही प्रत्यक्ष पाहावा. अनुभवावा अशी एक आंतरिक ओढ,हे पुस्तक वाचकांच्या मनात निर्माण करते. लेखक राजेंद्र वाकडे यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेला, काळजात जपलेला, निसर्ग सौंदर्याचा हा अक्षरठेवा,'भूतान… एक आनंदयात्रा 'पुस्तक रुपाने रसिक वाचकांना बहाल केला आहे. त्याचा मनस्वी आनंद घेऊया आणि उस्फूर्तस्वागत करुया." प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे जेष्ठ विचारवंत सातारा यांनी मलपृष्ठावर आनंद यात्रेच्या प्रवासाची भ्रमणगाथा अधोरेखित केली आहे. ती मनाला स्पर्शून जाते आणि वाचण्याचे कुतूहल वाढविते.

लेखकाने ही साहित्यकृती स्वर्गीय आई-वडील व त्यांचे प्रेरणास्थान ज्यांनी फिरण्यास आणि लिहिण्यास प्रोत्साहन दिले,आत्मबळ दिले.त्या सौ. शैलजा वहिनी आणि त्यांच्या लाडक्या कन्या प्रियंका व स्वरांजली यांना अर्पण केली आहे.
या भ्रमणगाथेस सातारा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माननीय श्रीनिवास पाटील साहेब, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी आदरणीय श्री महेश पालकर साहेब, दैनिक सकाळचे पत्रकार शिक्षकमित्र श्री सुनील शेडगे यांनी शुभेच्छा संदेश दिलेले आहेत.

' राजभवनमधील आशीर्वाद भवन हॉलमध्ये., राजभवन मधील flag down कार्यक्रम..,एका बड्या हस्तीचे आगमन,राज्यपाल महोदयांच्या सोबतचे सोनेरी क्षण, मोठ्या मनाचा माणूस, पाटील साहेबांविषयीची एक आठवण..'हे लेख आदरणीय माननीय खासदार श्रीनिवास पाटील साहेब यांच्या विषयी त्यांच्या कार्याची महती रेखाटली आहे.महोदयांच्या सोबतचे रंगीत फोटोही आकर्षक असून लेखमालिकांची उंची अधोरेखित करतात.

'भूतान एक आनंदयात्रा'या भ्रमण गाथेस निसर्गावर प्रेम करणारे निसर्ग अभ्यासक आणि भ्रमंतीकार व्याख्याते सन्माननीय डॉक्टर संदीप श्रोत्री यांची प्रस्तावना लाभली आहे.ते म्हणतात की,"जगातील सर्वात आनंदी देश भूतान.या देशातील प्रेक्षणिय स्थळांचा लिखित दस्तावेज मराठी भाषेमध्ये घेतलेला मोलाचा ठेवा आहे.पुस्तकातील सर्वच छायाचित्रे बोलकी व आकर्षक आहेत.प्रवासातील बारकावे आपण वेधक वेचक नजरेने टिपले आहेत. सृष्टीच्या सौंदर्याचे वर्णानातून दर्शन घडतंय,हा उत्कट अनुभवमिळण्याचं भाग्य वाचक रसिकांना मिळतेय."  

"हे रुक्ष प्रवासवर्णन नसून , पाहिलेल्या ठिकाणांची जंत्री नसून, हिरव्याकंच निसर्गाच्या कुशीत शिरून लुटलेल्या आनंदाची अक्षरदौलत आहे.आपली मराठी अस्मिता जपणाऱ्या माननीय खासदार श्रीनिवास पाटील यांच्या सहवासातील सुवासिक नोंदी वाचून आपलीही मान अभिमानाने उंचावते."असे कौतुकास्पद सुविचार 'ज्ञानयात्रींची भ्रमणगाथा' या लेखातून मांडतात.

मनोगतात लेखक मैत्री टूर ते पुस्तक आवृत्तीचा प्रवास कसा झाला.हे मनोगतात व्यक्त होतात. सर्व सहकार्य वृत्तीच्या ज्ञातअज्ञात हातांविषयी निरलसपणे कृतज्ञता व्यक्त करतात.प्रवासाचा आनंद मित्रांसोबत घेऊन आनंदानुभवाची अनुभूती रसिक वाचकांना यावी.याच उद्देशाने त्यांनी हा लेखनप्रपंच करुन  प्रवासवर्णनाचे 'भूतान एक आनंदयात्रा' पुस्तक निर्माण केले आहे.सहल यातल्या करणाऱ्या पर्यटकांना  मार्गदर्शक दीपस्तंभ म्हणून ,गाईड म्हणून उपयोगी पडणारी ही भ्रमणगाथा आहे.

'कलकत्ता-दार्जिलिंग-सिक्किमसह भूतान एक  आनंदयात्रा' या गाथेत ६६लेख आहेत. २०१६ सालातील नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात झालेल्या सहल प्रवासाचे वर्णन खुमासदार  शैलीत बहारदारपणे खुलविलेले आहे. लेखमालिकेचे नावेही आशय ठळक करणारी आहेत.अनेक घडलेले छोटे छोटे किस्से , गमतीजमती आदी स्थळकाळाची माहिती समर्पक शब्दांत मांडली आहे. पहिल्याच परदेश आणि इतर राज्यांच्या प्रवासाच्या उत्साहाची इच्छापूर्ती कशी झाली याचे वर्णन म्हणजे आनंदयात्रा.ओळखीच्या मित्रांशी दिलखुलासपणे आणि अनोळखी व्यक्तींशी परिचय करून मित्रता वाढवत केलेली भटकंती म्हणजे आनंदयात्रा.भूतान मधील स्वर्गीय निसर्ग सौंदर्याने भुरळ घातल्याने त्यांच्यातील कवीमन जागे झाले. आणि स्वरचित 'तू' कवितेच्या ओळी आठवतात.

जीवनाच्या त्या अनोख्या वाटेवरती
भेट तूझी झाली होती
बरसल्या होत्या चांदण्या
दिवसा रात्रभर झाली होती.
श्वासात तू ,हृदयात तू 
अष्टदिशातील माझा 
परिमल असे तू
आता उरल्या फक्त आठवणी
धुंद त्या क्षणांच्या..
स्वप्नातीत मनातील भावना आज कवितेने खऱ्या केल्या.याचा प्रत्यय आला.

टायगरहिल वरील सूर्योदयाची नजाकत पहायला बोचणाऱ्या थंडीतही पहाटे पर्यटक बहुसंख्येने दिसतात.ती काय सूर्योदयाची विलोभनीय दृश्ये दिसत असतील. त्याचे वर्णन अप्रतिम शब्दसाजात केले आहे.वाचताना प्रत्यक्ष आपणा समोरच सूर्योदय होतोय.असा भास निर्माण होणारं लेखन आहे.वाचताना क्षणाक्षणाला उत्कंठा शिगेला पोहोचते.
"सूर्यनारायणाच्या आगमनाचा रमणीय सोहळा अनिमिष नेत्रांनी बघणारे सहस्रजण." अशा वर्णनिय लेखाचे रसग्रहण करताना आनंद मिळतो. 
भारत व चीन सरहद्दीवरील  नथु-ला या १४०००हजार फुट उंचीच्या ठिकाणाचे वर्णन वाचताना यात्रेकरुंनी पर्यटकांनी कसे नियोजन करावे याची महत्त्वाची माहिती 'नथुलाच्या दिशेने व नथुलाच्या रस्त्यावरील वाढत्या थंडीचा कडाका..'या लेखातून समजते.तसेच नथुला आंतरराष्ट्रीय बॉर्डर ,भारतीय जवानांची राष्ट्रनिष्ठा आणि बाबा हरभजनसिंग मंदिर या लेखातील वर्णन वाचताना अद्भुतरम्य कहाणी वाटते.चैतन्यदायी माहिती समजते. वाचताना आपण भारावून जातो. खडतर वातावरणात देशाची सेवा करणाऱ्या जिद्दी सैनिकांचा अभिमान लेखातील प्रत्येक वाक्यातून समजत जातो.

लेखनमालिकेच्या समारोपात ज्यांनी व्हाटस अपवरुन कौतुक केले. लिखितअभिप्राय दिले. प्रतिक्रिया दिल्या.आनंदयात्रीविषयी मोबाईलवर संवाद साधला, हितगुज केले.त्या समस्त लेखमालिकेतील लेखास दाद देणाऱ्या सर्वंच वाचक मित्रांचा नामोल्लेख आवर्जून केला आहे. लेखनमालिकेचे प्रेरणास्थान आणि लेखाच्या पहिल्या वाचक त्यांची पत्नी सौ.शैलजाताई आणि कन्या स्वरांजली तसेच मोबाईलवर दररोज लेखन (टाईप) करणारी कन्या प्रियांका यांच्या  सहकार्यामुळेच लेखमालिका आणि पुस्तक तयार झाले हे नमूद करतात.

आनंदाची सफर 'भूतान एक आनंदयात्रा' प्रवासाची गाथा मार्गदर्शक म्हणून आपल्या संग्रही असावे असे वाटते.अप्रतिम अनमोल  अक्षरठेवा पुस्तक रुपात रसिकांना बहाल केला आहे. रसग्रहण करुन त्याचा आनंद घेण्यासाठी या पुस्तकाचे स्वागत करुया.

पुढील साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!!

परिचय कर्ता-रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई

लेखन दिनांक- ११ नोव्हेंबर २०२१
यापूर्वीचे पुस्तक परिचय, कविता व भटकंती वाचन्यासाठी
raviprema.blogspot.com या ब्लाॅगला भेट द्या.
############################
पुस्तक मिळण्याचा पत्ता व संपर्क  

 लेखक श्री राजेंद्र पांडुरंग वाकडे
तारळे ता.पाटण जि.सातारा
पिन कोड-४१५०१४
मोबाईल:९४२१६०८२२३

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know