*पुस्तक क्रमांक : 49.
*पुस्तकाचे नाव : पाचव्या बोटावर सत्य.
*वाङमय प्रकार : काव्यसंग्रह.
*कवी : उत्तम कांबळे.
*पृष्ठसंख्या : 118.
*स्वागतमूल्य : 80 रुपये.
*प्रकाशन : पदमगंधा
प्रकाशन.
*आवृत्ती :प्रथमावृत्ती
(2010).
*पुस्तक परिचयकर्ता : श्री. मनोज
अग्रवाल.
📙📙📙📙📙📙📙📙📙📙📙📙📙📙📙
मराठी साहित्य क्षेत्रातील प्रसिद्ध साहित्यिक उत्तम कांबळे यांनी लिहिलेला 'पाचव्या बोटावर सत्य' हा काव्यसंग्रह म्हणजेच प्रश्न आणि उत्तर स्वरुपातील कवितांचा संग्रह आहे . या कवितासंग्रहातील कवितांमध्ये कवी स्वतःलाच प्रश्न विचारतात आणि स्वतःच मार्मिक समर्पक आणि अप्रतिम असं उत्तर देतात
जे नैसर्गिक आहे त्याला आपण नाकारू शकत नाही हा विचार वाचकाच्या मनात ठसविण्यासाठी उत्तम कांबळे यांनी हा कवितासंग्रह निसर्गाला अर्पण केलेला आहे कवी म्हणतात .
निसर्गानं सांगितलेलं
निसर्गानं दाखवलेलं
पाचव्या बोटावरच हे सत्य
निसर्गासाठी अर्पण...
प्राध्यापक रा .ग .जाधव यांनी या कवितासंग्रहाला प्रस्तावना दिलेली आहे. महाभारतामध्ये ज्याप्रमाणे युधिष्ठिराला यक्ष हा प्रश्न विचारतो आणि युधिष्ठिर त्याच्या अद्वितीय असं उत्तर देतो अशाच प्रकारे हा प्रश्नोत्तर स्वरुपातील कवितासंग्रह आहे.
लाओ त्से या चिनी तत्त्वज्ञाचा उल्लेख या कवितासंग्रहाच्या मनोगतात उत्तम कांबळे करतात.. लाओ त्से हे गौतम बुद्धांच्या अगोदर झाले हाेते . तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांवर तत्त्वज्ञानावर लाओ त्से यांच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव पडलेला दिसून येतो असा विचार उत्तम कांबळे मनोगतामध्ये व्यक्त करतात.
एकूण 97 कवितांचा हा कवितासंग्रह वाचकाला वाचताना सोडवासा वाटत नाही ,वाचून पूर्ण झाल्यानंतरच वाचक या कवितासंग्रहाला बाजूला ठेवतो .
माणूस राबराब राबतो त्याचा घाम येईपर्यंत तो कष्ट करत असतो 'सुगंध 'या कवितेमध्ये कवींनी प्रश्न विचारलेला आहे आणि उत्तरही अतिशय सुंदर रीतीने दिलेला आहे .
तो म्हणाला ,
"जगात सर्वात सुंदर सुगंध कोणता?",
मी म्हणालो ,"
घामासाठी वाट करेन मी!"
कष्टानंतर घामाचा येणारा सुगंध जगातील सर्वात श्रेष्ठ, उत्कृष्ट सुगंध आहे असा उच्चकोटीचा विचार उत्तम कांबळे येथे व्यक्त करतात .
आपल्याला असं वाटतं की आपण स्वत: ला कधी फसवत नाही. मात्र प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीतीने कुठेतरी आपण आपली फसवणूक करून घेत असतो, अस अनेकांच्या आयुष्यामध्ये घडत, हा विचार फसवणूक या कवितेमध्ये कवी उद्धृत करतात.
त्यानं विचारलं,
"जगात सगळ्यात वाईट फसवणूक कोणती?"
मी सांगितलं,
" स्वत :ला कधी फसवत नाही मी !"
खऱ्या अर्थानं स्वत: ला बुद्धिवादी ,बुद्धिजीवी समजून आपण स्वत :ला कधीच फसवत नाही असा विचार मांडणं हेदेखील आपली एक फसवणूक आहे हा विचार कवी व्यक्त करतात.
कोंबडी आधी की अंडं आधी? हा अनेकांसाठी अनुत्तरित असलेला प्रश्न आहे आणि रहस्यमय प्रश्न आहे. यावर कवींनी कविता करताना अतिशय अप्रतिम असा विचार मांडलेला आहे .
त्यानं विचारलं," कोंबडी आधी की अंडं आधी ?या सनातन प्रश्नाचं उत्तर काय ?"
मी सांगितलं ,"फळात झाड आणि झाडात फळ पाहतोय मी."
फळामध्ये असणाऱ्या बीपासून झाड बनतं आणि झाडाला फळे लगडतात .नंतर त्या फळांपासून परत झाड बनतं. मग हा प्रश्न गूढगम्य आहे की आधी कोंबडी की आधी अंडं? हा विचार येथे कवीला मांडायचा आहे.
कधी कधी माणसाला आयुष्यामध्ये एवढा आनंद होतो की तो आनंद शब्दात देखील व्यक्त करु शकत नाही. मग अशावेळी काय तर 'शब्दांचे मृत्यू' या कवितेच्या माध्यमातून कवी हा आनंद शब्दांत व्यक्त होईल याचा ते प्रयत्न करतात .
त्यानं विचारलं ,
"तुला प्रचंड आनंद होतो तेव्हा नेमकं काय करतो."
मी सांगितलं,
" शब्दांच्या निधनाबद्धल शोक करतोय मी !"
म्हणजेच आनंद ही भावना एवढी अमूर्त असते त्यासाठी शब्द हे भाषेमध्ये शब्द मृत्यू पावलेल्या आहेत आणि त्यांच्या निधनाबद्दल मला दु:ख झाले आहे असा विचार कवी येथे मांडतात.
आईचं महात्म्य शब्दांमध्ये व्यक्त करता येण्यासारखं नसतं ते शब्दांच्याही पल्याड असतं.हा विचार आपल्या मातृमहात्म्य या कवितेतून प्रकट करताना उत्तम कांबळे म्हणतात ,
त्यानं विचारलं ,
"आईचं महात्म्य कोणत्या शब्दांत व्यक्त करत असतो?"
मी सांगितलं ,
"नव्या लिपीचा शोध घेतोय मी"
आईचं महात्म्य, आईचं महानपण आपल्या शब्दांच्याही पलीकडच असतं.ते शब्दामध्ये मावेल एवढ संकुचित नसते मुळी!
आज आपण आहोत, कदाचित उद्या आपण नसू .आपण आज आहे उद्या नाही .मात्र हे जग कालही होतं, आजही आहे आणि उद्याही असणार आहे. या जगाचे आयुष्य किती आहे असा प्रश्न कवीच्या मनात येतो आणि कवी मग त्याला अतिशय सुंदर शब्द साज चढवून उत्तर देतात .
त्यानं विचारलं ,
"आपण राहतो ते जग आणखी किती वर्षे टिकेल?'
मी सांगितल, "काळजातली स्पंदन मोजतोय मी."
काळजामुळे धडधडणार्या हृदयाची स्पंदने थांबली की आपलं जग थांबेल म्हणजेच आपलं आयुष्य थांबेल इतरांचं आयुष्य, हे जग चालूच राहील.
खरं म्हणजे धर्म हा माणसाच्या विकासासाठी आहे. मात्र धर्मा धर्मामध्ये भेदाभेद निर्माण करून युद्ध निर्माण करण्याची धर्म कंटकांचे समाजकंटकांची उठाठेव चालू असते आणि मग 'धर्माच्या पाऊलखुणा' या कवितेमध्ये कवी स्वत: ला एक प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नाचं उत्तरही त्या अतिशय छान रीतीने देतात .
त्यानं विचारलं,
" जगभरातल्या धर्मांच्या पाऊलखुणा पाहतोस का कधी तो?"
मी सांगितलं ,
"काट्यापासून स्वत:ला वाचवतोय मी."
समाजामध्ये अनेक माणसं विश्वासघात करणारे असतात विश्वासघात केल्यानंतर आपण नेमकं कसं वागायचं हे 'विश्वास' या कवितेतून उत्तम कांबळे अतिशय अप्रतिम रीतीने व्यक्त करतात .
तो म्हणाला ,
"एखाद्याने विश्वासघात केल्यास प्रत्युत्तर कसे देशील तू ?"
मी म्हणालो," स्वत :वरचा विश्वास वाढवतोय मी!"
आज ज्ञानार्जन करणाऱ्या शिक्षकांची टंचाई आहे हा विचार 'शिक्षक' या कवितेतून कवी उत्तम कांबळे मांडतात,
त्यानं विचारलं ,"
भरभरून ज्ञान देणाऱ्या शिक्षकाचा कसा सत्कार करशील?"
मी सांगितलं ,"ज्ञानार्जन करणारा शिक्षक शोधतोय मी!"
जगामध्ये काळ्या रंगाची अवहेलना होते मात्र काळा रंग हा महान आहे. हा विचार 'काळा रंग' या कवितेच्या माध्यमातून कवींनी वाचकांच्या मनावर बिंबवलेलं आहे.
त्यानं विचारलं,
" गोरा रंग सुंदर असतो हे अमान्य का करतो?"
मी सांगितलं ,
"काळ्याच्या गर्भातील सात रंग जपतो मी!"
पांढऱ्या रंगामध्ये सर्व रंग समाविष्ट होत असले तरीसुद्धा काळा रंग हा पार्श्वभूमी घेऊन जेव्हा इतर रंगांना उजाळा देतो तेव्हा इतर रंग किती सुंदर दिसतात त्या काळ्या रंगावर !
खरं म्हणजे या निसर्गाचे आपण आभार मानायला हवेत निसर्गानं भरपूर दिलेले आहे. भरभरून दिलेलं आहे. वानवा ठेवलेली नाही आणि म्हणून निसर्गाचे आभार मानण्यासाठी कवी' निसर्ग' ही कविता करतात.
त्यानं विचारलं,
" वाट वगळता सर्वकाही देणार्या निसर्गाविषयी काय सांगशील?" मी सांगितलं ,
" निसर्गाचे आभार मानतोय मी?"
साऱ्या जगाचा सत्ताधीश झालो तर मी काय करेन तर समतेची विजय मी पेरण्याचा प्रयत्न करेन .विषमतेची रुजलेली बीजे संपवण्याचा मी प्रयत्न करेन असा उच्चकोटीचा विचार कवींनी 'सत्ता' या कवितेतून मांडलेला आहे.
तो म्हणाला,
" साऱ्या जगाचा सत्ताधीश झाल्यावर काय करशील?"
मी म्हणालो ,"विषमतेची पेरणी नाकारतोय मी!"
मी सत्ताधीश झालो तर मला सर्वसमावेशक 'समता'अपेक्षित आहे हा अमूल्य विचार कवी या कवितेत मांडतात .
एकंदरीतपणे प्रश्नोत्तररूपी असलेला हा कवितासंग्रह वाचकाला मनास भावल्याशिवाय राहत नाही.कवींचे विचार मनाला पटतात आणि निश्चितपणे एक नवीन अद्वितीय शिकवण या कवितासंग्रहातून वाचकाला प्राप्त होते .
या काव्यसंग्रहात इतरही अनेक सुंदर कविता आहेत.
* श्रद्धांजली
*बुद्ध
*कलयुग सत्ययुग
* प्राणी
*जगप्रवास
*वस्त्रसंस्कृती
*कृतज्ञता
*धर्माच्या पाऊलखुणा
*श्वासाचीभाषा
* पाप
*शिक्षा
*मेंदू
*सांगाडा
*संस्कार
*ज्ञानवाटा
*निसर्ग
* चुंबन
* वर्तमान
*तत्त्वज्ञान
*रडणे
* आत्महत्या
*दंगली
*लोकशाही
*सुरक्षित जागा
*यंत्रमानव
*मादी
* महायुद्ध
*जगणं
* वटवाघूळ
*अमृत
* संसार
*पुनर्जन्म
*प्रेम
*काळ
*प्रेमभंग
*पोकळी
*रात्र
* शहाणे
*वाट
*झाड
*हस्तरेषा
*शोकगीत
या पुस्तकाच्या मलपृष्ठावर ताओवादाविषयी सांगितलेले
आहे .ताओवाद निसर्गाशी नातं सांगणारा विचार होय. निसर्गापासून दूर जाणं म्हणजे संकटाच्या गावात जाणं आणि निसर्गाच्या हातात हात घालणं म्हणजे सुरक्षित आणि सुंदर जगणं आहे . निसर्गाच अद्वितीय महात्म्य ,महानपण या तत्वज्ञानाने जगाला स्पष्ट करून सांगितलेले आहे.
आपल्या पुस्तकांच्या संग्रही असावे असे एक उत्तम पुस्तक म्हणजेच 'पाचव्या बोटावर सत्य'
मन :पूर्वक धन्यवाद!.....
श्री. मनोज अग्रवाल.(औरंगाबाद)
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know