पुस्तकाचे नाव : किनारा.
कवीचे नाव : कुसुमाग्रज.
पुस्तक क्रमांक : 28.
पुस्तक परिचयकर्ता :श्री. मनोज अग्रवाल.
पृष्ठसंख्या : 90.
स्वागतमूल्य: 100 रुपये.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज यांचा हा विशाखा या काव्यसंग्रहानन्तर आलेला दुसरा काव्यसंग्रह 10 वर्षांनी प्रकाशित झाला होता.
कवींनी या काव्यसंग्रहातील कवितांमध्ये काव्य प्रतिभा,भाषासौंदर्य यांचा उत्तम परिचय करून दिला आहे.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते महान साहित्यिक वि. स.खांडेकर यांनी या काव्यसंग्रहास वाचनीय, आशयघन प्रस्तावना दिली आहे.
ज्याप्रमाणे समुद्राला किनारा असतो त्याप्रमाणे कलावंताला लेखनाची मर्यादा असते,मात्र समुद्राला किनारा असला तरी शिंपले रिकामे पडण्याचे काहीच कारण नाही असे , असे सुंदर मत खांडेकर मांडतात .
किनारा कवितेत कवी अतिशय सुंदर रीतीने शब्दांची रचना उद्धृत करतात ,
आला किनारा !
नीनादे नभी नाविकांनो इशारा आला किनारा !
उद्याम दर्यामध्ये वादळी जहाजे शिडाऊन ही घातली
जुमानीत ना पामरांचा हकारा आला किनारा !
समुद्र जरी उद्दाम वर्तन करत असला तरी आम्ही साहसाने जहाजे या उद्दाम समुद्रात घातली. यावरून कविता वीररस दर्शवतात.
वर्षागमन या कवितेत कवी पावसाचे आगमन अतिशय समर्पक पद्धतीने वर्णतात.
सजल श्याम घन गर्जत आले
बरसत आज तुषार
आता जीवनमय संसार!
पावसाच्या आगमनाने जीवन प्राप्त होणार आहे म्हणजे जल प्राप्त होणार आहे आणि जीवनमय संसाराची ही सुरुवात आहे.
तारका या कवितेत कवीची निरीक्षण कुशलता दिसून येते,
तुझिया तांबूस तेजाची ज्योत
देखता आकाशी निरभ्र नील
जननंतरीचे अंतरी गूढ
सौहृद उमले सुगंधशील!
स्नेहाचे रहस्य आपुल्या असे
निद्रिस्त जगास ठाऊक नाही
सस्मित होऊन आकाश मात्र
मिलन आपुले पाहत राही!
निसर्गाकडे पाहण्याची सौंदर्य दृष्टी, कुसुमाग्रज यांची अप्रतिम भाषाशैली दिसून येते.
'विराट वड' या कवितेत वडाची प्रचंडता कवीने सुरेखपणे
वर्णीली आहे.
गावाच्या सीमेस नदीच्या तिरा
पारंब्या-फांद्यांचा घालून डेरा-
विषणं दृष्टीने देखत नभा
विराट वड हा राहिला उभा.
काळाची असंख्य पाखरे आली
जीवन-कणिका टिपून गेली
अनेक पिढ्यांची यात्रा विशाल
तयाच्या पुढून गेलेली पैल
विस्तीर्ण पसरलेला, उंच असलेला वड नदीच्या किनाऱ्यावर कसा उभा राहिला आहे आणि तो कशा रीतीने वर्तन करतोय हे कुसुमाग्रज यांनी वर्णिले आहे.
निळा पक्षी या कवितेत सकाळ झाल्यावर पक्षी उत्साहाने पुलकित होऊन निसर्गाचा मनमुरादपणे आनन्द लुटतात हे
कवीने छान रीतीने रचले आहे.
उष:कालचे प्रकाशमंडल येता प्राचिवर
निळे पाखरू त्यातून कोणी अवतरले सुंदर
फुलराणीचे विलासतारु निळी उभारुनी शिडे
सोनेरी दारियातून आले - आले माझ्याकडे
निळ्या अनंता मिळून गेला माझा पक्षी निळा
रखरखती भवताली आता मध्यानीच्या झळा!
माझा हिंदुस्थान या कवितेत कवी भारताच्या भौगोलिक सौंदर्याचे सुंदर रीतीने वर्णन करतात.
माझा हिंदुस्थान!माझा हिंदुस्थान!
हिमचलाचे हिरकमन्दित शिरभूषण भरदार
वक्षावर गंगायमुनांचे रुळती मौक्तिविहार
कटीस तळपे मराठमोठ्या गोदेची
तरवार
महोद्धीचे चरणाजवळी गर्जतसे आव्हान
माझा हिंदुस्थान!
या कवितासंग्रहात अबोध, उणीव, मिलन, सुदामा, कायदा, माता अशा विविध शब्दसौंदर्य ,भाषालावन्य दर्शवणाऱ्या कविता आहेत.
कुसुमाग्रज यांच्या सुरेख लेखनशैलीस नम्रपूर्वक नमन!
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know