Sunday, October 17, 2021

पुस्तकाचे नाव : शेतकऱ्याचा असूड

वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक क्रमांक : 32.

पुस्तकाचे नाव : शेतकऱ्याचा असूड.

लेखक : महात्मा फुले.

पृष्ठसंख्या : 126.

स्वागतमूल्य : 150 रुपये.

प्रकाशन संस्था : साकेत प्रकाशन.

पुस्तक परिचयकर्ता : श्री. मनोज अग्रवाल.

     थोर समाजसुधारक ,क्रांतिसूर्य ज्ञानसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांची विदारक परिस्थिती 'शेतकऱ्यांचा आसूड' या ग्रंथात वर्णन  केली   आहे .अठराशे  त्र्याहत्तर साली महात्मा जोतिबा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहिला .शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाची  अनेक संपादने आजपर्यंत झालेली   आहेत ;पण आजही या ग्रंथातील आशयाची यथार्थता टिकून आहे .शेतकऱ्यांची तत्कालिन विपन्नावस्था आजही कमी झालेली नाही याची प्रचीती   शेतकर्यांच्या एकंदरीत परिस्थितीवरून दिसून येतं.शेतकऱ्याचा आसूड या साकेत प्रकाशनाने संपादित केलेल्या ग्रंथामध्ये प्रस्तावना भास्कर लक्ष्मण भोळे यांनी लिहिलेली आहे.
    भास्कर लक्ष्मण भोळे लिहितात की कोरडवाहू शेतकऱ्यांची वाईट अवस्था ही दयनीय अशी आहे .शेतकऱ्यांच्या वस्तुस्थितीचे दर्शन समाजाला घडावे हा मूळ उद्देश हा  ग्रंथ लिहिण्यामागील महात्मा फुलेंचा आहे . 
    एकूण पाच मुख्य प्रकरणांमध्ये हा ग्रंथ विभागलेला आहे . विशिष्ट समाजाचे लोक सरकारी खात्यांमध्ये प्राबल्याने असल्यामुळे त्यांनी आपल्याच समाजाचे लोक अधिकाधिक प्रमाणात तेथे भरती केले असल्यामुळे अज्ञानी शेतकर्यांना येथे अडचणीत आणले जाते. त्यांचे  मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक आणि मानसिक शोषण करण्यात येते . त्यांच्या मुलाबाळांना शाळेत टाकण्यासाठी त्यांच्याकडे पैसा सुद्धा शिल्लक राहत नाही .त्याचप्रमाणे या शेतकर्यांकडे त्यांच्या मुलांना झाकण्यासाठी कपड्यांसाठी पैसे सुद्धा शिल्लक राहत नाही ;म्हणून शेतकऱ्यांची मुले ही उघडी    दिसतात .अशा रीतीने   हृदयाला पिळवटून टाकणारी वस्तुस्थिती शेतकर्यांची महात्मा फुले यांनी या प्रकरणामध्ये वर्णिलेली आहे .पोटाला पोटभर अन्न खाऊन जगण्याची भ्रांत या शेतकर्यांना पडलेली   असते त्यामुळे ते मुलांच्या शिक्षणाचा विचारदेखील करत नाहीत.आजच्या परिस्थितीत थोडा बदल झालेला असला तरी शेतकरी हा पूर्णतः सुखी नाही हे भारतीय शेतीप्रधान देशाचे   वास्तविक चित्र आहे.
     दुसऱ्या प्रकरणामध्ये महात्मा फुले  म्हणतात की सरकारी गोऱ्हे अधिकारी हे बहुतकरून मज्जा   करण्यामध्ये गुंतलेले  असल्यामुळे शेतकऱ्यांची विदारक अवस्था, विपन्नावस्था त्यांच्या नजरेस येत नाही किंवा त्यांना माहीत असूनसुद्धा शेतकऱ्यांच्या हलाखीच्या परिस्थितीबद्दल ते दुर्लक्ष करतात, कानाडोळा करतात .शेतकऱ्यांच्या गरिबी अवस्थेला त्यांनी दाखवलेला म्हणजेच गोऱ्या   अधिकाऱ्यांनी दाखविलेला गाफीलपणा हे मुख्य कारण देखील महात्मा फुलेंनी येथे व्यक्त केलेला आहे.आयुष्यभर हलाखीच्या विदारक गरिबी अवस्थेमध्ये पिचलेल्या शेतकऱ्याच्या जेव्हा   मृत्यू होतो त्यांच्या मृत्यूनंतरदेखील त्यांचे   सर्व  अंतिम संस्कार विधी पूर्ण करावे   लागतात त्या विधींसाठी तो सावकारांकडून कर्ज घेतो आणि कर्जबाजारी होतो आणि कर्जबाजारी अवस्थेमध्ये तो जगताना अनेकदा मरतो ही वस्तुस्थिती आहे असे महात्मा फुले   संवेदनशीलपणे येथे मांडतात .
    इंग्रज अधिकारी कर्मचार्यांना, कामगारांना मनाला मानेल तसे पगार देतात ,पेन्शन देतात आणि या सर्व खर्चाचा बोजा कराच्या स्वरूपामध्ये शेतकऱ्यांच्या डोक्यावर लादतात .हा बोजा शेतकरी सहन करु शकत नाही किंवा बोजा सहन करता करताच त्याचा बळी जातो, त्याचा मृत्यू होतो किंवा तो आत्महत्या करतो.
शेतकर्यांची   मनाला   हेलावून टाकणारी परिस्थिती वर्णन करताना महात्मा फुले म्हणतात की ज्याप्रमाणे गरीब हरणे   ही जंगली श्वापदांना घाबरून पळून जातात,  ज्याप्रमाणे झाडांवर मधुर गायन करणारे  पक्षी, आरामात स्वच्छंद विहार करणारे पक्षी हे बहिरी ससाणा याला घाबरून   स्वतःचा जीव वाचवतात त्याप्रमाणे शेतकरी  खूप  सहन करतो. येथील दु :ख अन्याय, अत्याचार  शेतकऱ्यांच्या माता ,भगिनी या वाईट वळणाला लावल्या जातात .
    चौथ्या प्रकरणामध्ये  महात्मा फुले शेतकर्यांच्या वस्तुस्थितीबद्दल लिहितात  की सरकारी कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना अपेक्षेएवढी लाच न दिल्या गेल्यामुळे ज्या शेतकर्यांच्या जमिनीवरचा शेतसारा दुप्पट करण्यात आला आहे. असे  हताश, निराश शेतकर्यांच्या घराच्या हलाखीचे  ज्योतिराव येथे वर्णन   करतात .या प्रकरणात महात्मा ज्योतिबा फुले आवर्जून सांगतात की शेतकर्यांच्या मुलांना शिकवलं गेलं पाहिजे, त्यांना शिक्षण जे आहे ते महत्त्वपूर्ण आहे आणि त्याला किमान प्राथमिक शिक्षण दिले गेले पाहिजे .
     पाचव्या प्रकरणामध्ये महात्मा जोतिबा फुले  तत्कालीन समाजातील उच्चभ्रूंना, त्याचप्रमाणे  इंग्रजांना काही उपाय सुचवतात.  ते म्हणतात की ज्याप्रमाणे उच्चभ्रूंची मुले शिक्षण घेतात त्याप्रमाणेच शेतकर्यांच्या मुलांना हे शिक्षण मिळायला पाहिज।  ढोरे  वळण्यापेक्षा त्यांना शेतीचे  आधुनिक ज्ञान प्राप्त झाले पाहिजे .  शेतकऱ्यांच्या माता भगिनी वाईट वळणाला लावल्या जातात .त्यांना वाईट वळणाला   लावणाऱ्यांना   कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी कायदे केले पाहिजेत. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी बोर्डिंग तयार केले पाहिजे. त्याचप्रमाणे  विविध कार्य करून समाजामध्ये कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित केली  पाहिजे . शेतकर्यांवर लादल्या जाणारे   अतोनात कर हे कमी केले पाहिजेत  .तत्कालीन समाजाला त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून एकप्रकारे आसूड मारला आहे। शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून महात्मा ज्योतिबा फुले या ग्रंथामध्ये परखडपणे मत व्यक्त करताना लक्षात येता.  हा एकप्रकारे शेतकऱ्यांच्या मनातील आसूड महात्मा जोतिबा फुले यांनी तत्कालीन व्यवस्थेला अतिशय चपखलपणे लगावला आहे हे आपल्या लक्षात येतं  .  या सगळ्यामुळे नक्कीच त्यावेळी असलेल्या व्यवस्थेला घाम फुटला असेल ,हे मात्र निश्चित !
     महात्मा फुले यांचे स्पष्टवक्तेपणा, परखडपणा   आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची त्यांची वृत्ती या ग्रंथांमधील त्यांच्या लेखनातून वारंवार निदर्शनास येते  .
     आपल्या पुस्तकांच्या संग्रही   असावा असा एक महत्त्वपूर्ण ग्रंथ म्हणजे शेतकर्याचा आसूड होय .
   महात्मा ज्योतिबा फुले या महामानवास विनम्र अभिवादन  !

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know