पुस्तकाचे नाव : #बुद्धांच्या_संस्कारक्षम_गोष्टी (सचित्र)
लेखक सागर शिंगणे
प्रकाशक लोकायत प्रकाशन, सातारा
मूल्य: 70 रूपये
आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या बालपणी आपल्या आजी-आजोबांकडून गोष्टी ऐकण्याचा आनंद घेतलेला आहे. गोष्ट हा अनेकांचा आवडता विषय आहे हे काही वेगळं सांगायला नको. खरंतर बालमन हे मातीच्या गोळ्याप्रमाणे असतं. तुम्ही त्याला जसा आकार द्याल तसं ते घडत जातं. या कोवळ्या वयात योग्य त्या विचारांचं बिजारोपण केलं की एक संस्काररूपी व्यक्तिमत्व आकारास येतं. गोष्टींच्या माध्यमातून बालमनावर होणारे संस्कार हे समाजाच्याच नव्हे तर देशाच्या विकासासाठीही उपयुक्त ठरतात. आजच्या काळात मात्र विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आजी आजोबांकडून गोष्टी ऐकण्यास मिळणं तसं जरा कठीणच. हीच कमतरता भरून काढण्याचं काम विविध विषयांवरील गोष्टीची पुस्तकं करतात. असंच एक पुस्तक दिसलं आणि ते घेण्याचा मोह अनावर झाला. मग काय 'बुद्धांच्या संस्कारक्षम गोष्टी' हे पुस्तक मागवलं. सागर शिंगणे यांनी संपादित केलेलं हे पुस्तक उघडताच मुखपृष्ठाच्या आतील पानावर आपल्याला संत तुकाराम महाराज स्वामी विवेकानंद, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आचार्य रजनीश या विविध महमानवांचे बुद्धांबद्दलचे विचार दिसून येतात आणि मग बुद्ध समजून घेण्याची जिज्ञासा आणखी वाढत जाते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत असत, "दादा केळूसकरांनी दिलेल्या बुद्धचरित्रामुळे मी भगवान बुद्धांकडे वळलो. त्या लहान वयातही रिकाम्या डोक्याने मी भगवान बुद्धांकडे गेलो नाही." यावरूनच आपल्या लक्षात येते की, बालपणीच बाबासाहेबांच्या मनावर स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि त्याचबरोबर प्रज्ञा व करुणेचे विचार रुजले होते. त्यांनी स्वतः आजीवन या विचारांचे पालन तर केलेच शिवाय आपल्या भारतीय संविधानात त्यांचा समावेश करून ते प्रत्येक भारतीयाच्या मनात रूजवण्याचाही प्रयत्न केला. थोडक्यात सांगायचं झालं तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणेच आजच्या पिढीतील मुलांनाही बालवयातच बुद्ध विचारांची ओळख झाली तर त्यांचे जीवनही नक्कीच उजळेल. हाच उद्देश मनाशी बाळगून सागर शिंगणे यांनी या पुस्तकाची निर्मिती केली आहे.
या पुस्तकात बुद्धांच्या एकूण अकरा संस्कारक्षम गोष्टींचा समावेश केलेला आहे. विशेष म्हणजे पहिल्याच प्रकरणात त्यांनी अगदी सोप्या भाषेत बुद्धांची ओळख करून दिली आहे. त्यानंतर विविध प्रसंगातील बुद्धांचे उपदेश गोष्टींच्या माध्यमातून चित्रित केलेले आहेत. इतरांच्या मताचा आदर करणे, कष्टाला पर्याय नाही म्हणून मेहनत करणे अपरिहार्य आहे, राग माणसाचा शत्रू आहे तेव्हा क्रोधित होऊन अपशब्द बोलण्यापेक्षा रागावर नियंत्रण ठेवणे हितावह असते, एकता ही शक्ती आहे, हिंसा व द्वेष यांचा त्याग करून दुर्गुणी व्यक्ती सद्गुणी बनू शकते, याव्यतिरिक्त मनुष्य जीवन मौल्यवान आहे, जात धर्म संपत्ती यापलीकडे जाऊन विचार करणे, निंदा ही सुधारण्याची संधी असून निंदेमुळे व्यक्ती स्वतः मध्ये परिवर्तन घडवून आणू शकते, काल्पनिक आणि अनावश्यक गोष्टींऐवजी व्यक्तीने प्रत्यक्ष गोष्टींवर आपलं लक्ष केंद्रीत करायला हवं, ज्ञान ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. मुलगा-मुलगी एकसमान आहेत तेव्हा त्यांच्यात भेदभाव करू नये अशी विविध प्रकारची शिकवण देणार्या गोष्टींचा यात समावेश आहे.
या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे लेखकाने या पुस्तकाच्या संपादनासाठी 'सर्वोत्तम भूमिपुत्र गोतम बुद्ध' या पुस्तकाचे प्रसिद्ध लेखक डॉ. आ. ह. साळुंखे यांच्याशी चर्चा करून या बोधपर गोष्टींचे संपादन केले आहे. शिवाय प्रत्येक गोष्टीतील प्रसंग चित्ररूपातही सादर केलेला आहे. त्यामुळे पुस्तक आकर्षक बनले आहे. हे पुस्तक केवळ बालवाचकांसाठीच नव्हे तर बुद्ध विचारांच्या दिशेने जीवनप्रवास करू इच्छिणार्या प्रत्येकासाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी नक्कीच आहे.
• संगीता दाभाडे
औरंगाबाद
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know