Saturday, October 23, 2021

पुस्तक: खिल्ली

पुस्तक: खिल्ली
लेखक: पु ल देशपांडे. 
प्रकाशक: श्रीविद्या प्रकाशन, पुणे

या पुस्तकातील #एका_गांधी_टोपीचा_प्रवास या लेखात पु ल देशपांडे म्हणतात...

कधी एखादा हिंदुत्ववादीही यायचा- हे लोक हिंसावादी असल्याचा आव आणीत. तोंडाने भगतसिंग, सावरकर प्रभूतींची तारीफ करीत. परंतु त्यांचे हाथ पिस्तुलाशी न जुळता, अकाऊंट जनरलचे ऑफिस, पोस्ट, रेल्वे, रेव्हेन्यू डिपार्टमेंट असल्या सरकारी चाकरीत लेखणी घासण्यात गुंतलेले असायचे. 

गांधीजींच्या चळवळीत फार मोठ्या प्रमाणात बहुजन समाज आला होता. हजारोंच्या संख्येने बायका सत्याग्रहात शिरून तुरुंगात चालल्या होत्या. हिंदुत्ववाद्यांना समाजाच्या सर्व थरातले हे चैतन्य महत्वाचे वाटत नव्हते. या मंडळीत एक विलक्षण नतद्रष्टेपणा असायचा. राजकीय चळवळ म्हणजे एक व्यासपीठ, दोन खुर्च्या, मग अध्यक्षाचे फर्डे भाषण, आभार हीच या लोकांची कल्पना होती. वाचावीरच स्वराज्य मिळवून देईल. फार तर कुणीतरी ५-१५ बॉम्ब वगैरे फेकावे.(स्वतःचा मुलगा मात्र नसावा. त्याला कुठेतरी चिटकवून द्यायची तयारी चाललेली असायची.)

वेळोवेळी इतिहासाच्या पूर्वदिव्यात घुसायचं... असली काहीतरी चमत्कारिक वृत्ती असलेली हि माणसे! त्यात काही मंडळी "काय म्हणतोय तुमचा गांधी?" असं विचारून "एकूण सारा पोरखेळ चाललाय" असा शेरा मारून जायचे. बाबू गेनू नावाच्या एका मजुराने परदेशी कापडाची लॉरी पुढे जावू देणार नाही या निर्धाराने स्वतःला त्या खाली चिरडून घेतले होते. ही असली उदाहरणे डोळ्यापुढे घडत असतानाही, ही चळवळ आता समाजाच्या कुठल्या थरापर्यंत पोचलेली आहे याची जाणीव या गांधीद्वेषाने अंध झालेल्या मंडळीना येत नव्हती. ही चळवळ आता समाजाच्या कुठल्या थरापर्यंत जाऊन पोहोचली आहे, याची जाणीव या गांधीविरोधाने अंध झालेल्या मंडळींना येत नव्हती. हिंदुत्ववाल्यांपैकी बहुतेकांचा 'आपण टिळक सांप्रदायातले आहोत' असाही गैरसमज होता.

स्वातंत्र्याचे एवढे यज्ञकुंड पेटलेले असताना ही मंडळी कुठल्यातरी ऐतिहासिक जमान्यातल्या लुटुपुटूच्या युद्ध कल्पनांत दंग होती. ब्रिटिशांविरुद्ध 'ब्र' नव्हता. सारी शक्ती आणि बौद्धिके फक्त गांधीद्वेषाने भरलेली. हिंदु मुसलमानांच्या दंग्यात मुंबईत आमचे कोकणी रामा आणि गिरणमजूर गुंडांची टाळकी सडकायला बाहेर पडत. सोडावॉटरच्या बाटल्यांची 'फ्री फाईट' होई. तिथे सरळ ' तू माझे डोके फोडतोस की मी तुझे ते बघू या' हा कायदा होता. पण हे हिंदुधर्मरक्षक मात्र हवेत लाठी फिरवून गनिमांची टाळकी फोडण्याची दिवास्वप्ने पाहात होते.

गांधीजीचा मुसलमानधार्जीणेपणा हे त्यांचे एकमेव पालुपद. सोजिरांनी स्त्रियांवर केलेल्या अत्याचारांच्या निषेधापेक्षा मुसलमान गुंडांनी केलेल्या अत्याचारांच्या वेळी त्यांच्या लेखणीला आणि वाणीला विशेष धार चढे. बरे, हिंदू-मुस्लीम दंगलीत कधी ही मंडळी त्या मोहल्ल्यात जाऊन दहशत बसवून आली म्हणाव तर तेही नव्हतं. हे येरू वगळले तर त्या काळी आम्हा अनेकांच्या आयुष्याचे कर्णधार महात्मा गांधीच होते.

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know