Sunday, March 13, 2022

पुस्तकाचे नाव: धडपडणाऱ्या तरूणाईसाठी

1) वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
 2) परिचय कर्तीः सौ भाग्यश्री दिलीप कुलकर्णी 3)पुस्तक क्रमांक : 2 
4)पुस्तकाचे नाव: धडपडणाऱ्या तरूणाईसाठी 5)लेखक: संदीप कुमार साळुंखे
6) प्रकाशक राजहंस प्रकाश
7) प्रकाशन व आवृत्ती: 14 वी आवृत्ती 2018 8)एकूण पृष्ठसंख्या: 175 
9)वाड्मय प्रकार: आत्मकथन
10) मूल्य :225 
    धडपडणाऱ्या, ठेचाळणाऱ्या, पडणाऱ्या, जखमी होणाऱ्या, पुन्हा उठणाऱ्या, अन् चालत राहणाऱ्या तरुणाईसाठी, त्यांच्या पालकांसाठी, शिक्षकांसाठी आणि तरुणाईच्या या धडपडीकडे केवळ 'पहाणाऱ्या' प्रत्येक समाज घटकासाठी ही अक्षर वारी........
 स्वप्न पाहायला कोणी शिकावं, शिकवावं लागत नाही. तरुणाई स्वप्नाळू असतेच मुळी. पण स्वप्न सहजासहजी साकार होत नाहीत. ती कठोर परीक्षा घेतात आणि कोणतीही दयामाया न दाखवता अनेकांना अपयशाचे चटके देतात सहाजिकच पदरी निराशा येते. पुढची वाट दिसेनाशी होते. काय करावं, कुठे जावं..... काही कळत नाही. मार्गदर्शक मित्र भेटत नाही.... अशा असंख्य तरुणांना थोरल्या भावाच्या नात्याने धीर देणाऱ्या उठून उभे राहण्यासाठी हात देणाऱ्या आणि स्वप्न साकार करण्यासाठी नेमकी कोणती साधना कशी आणि केव्हा करायची हेही समजावून सांगणाऱ्या एका तरुणाचं हे बावन्नकशी लख्ख आत्मकथन...
 एकेकाळी रस्त्यावरचं शेण वेचून गोवऱ्या रचणारा तो गरीब ग्रामीण युवक आज एक यशस्वी उच्चपदस्थ सनदी अधिकारी आहे. पण स्वतःच्या यशाच्या धुंदीत तो बांधवांना विसरलेला नाही. भेटतील त्या साऱ्यांना प्रेरणेचे दिवे, आंदण देत तो सांगतोय-  असं हे  पुस्तक "धडपडणाऱ्या तरुणांसाठी" लेखक संदीपकुमार साळुंखे  
 त्यांच्याकडे खूप धार्मिक आणि अध्यात्मिक पुस्तके होती धार्मिक वातावरण घरात होतं. आणि प्रत्येकाच्या घरात असायला हवं असं लेखकाला व्यक्तीशः वाटतं.खूप कर्मकांड किंवा अवडंबर नसावं पण थोडी अध्यात्मिकता, धार्मिकता मात्र असायलाच हवी. सध्याच्या परिस्थितीत भौतिक आणि शारीरिक सुखाच्या अवास्तव्य कल्पना यांनी जो हैदोस मांडला आहे त्यापासून आपल्याला आणि आपल्या मुलांना वाचवण्यासाठी हे आवश्यकच आहे असं लेखकाला वाटतं, ग्रामीण भागात प्रतिकूल परिस्थितीत न्यूनगंडाने पछाडलेले या वातावरणात राहूनही सतत उच्च विचारांचे चिंतन करण्याची शक्ती याच अध्यात्म ,अध्यात्मिक केंद्राने लेखकाला दिली.
 कोणत्याही सोयीसुविधा नसतानाही आणि अगदी खेड्यात कौलारू शाळेमध्ये यांचे शिक्षण खूप चांगल्या पद्धतीने झालं
        वडिलांनी लिहिलेल्या पत्रांचं इतकं सुरेख विवेचन या पुस्तकामध्ये आहे ते असे म्हणतात की या पत्रामध्ये केवळ मात्यापित्यांच्ं प्रेम नव्हतं तर आमच्या कुटुंबाचा आरसा होता आपण कोणत्या परिस्थितीतून आलो आहोत याची जाणीव होती जबाबदारीचे भान होतं आपल्या पाठीशी संत कृपा आहे आणि प्रत्येक होतकरू तरुणाच्या  माणसाच्या पाठीशी ती असते असा आश्वासक आधार होता मी कित्येकदा ती पत्र वाचीत  बसे..... अभ्यासाला हूरूप येई, लढायला बळ मिळे.. आजही ही सारी पत्र जपून ठेवलीत... आजही कधीकधी कुटुंबात एकत्र बसून ही पत्र वाचून दाखवतो... पाय जमिनीवर राहू द्यायला आणि आपल्या मातीतल्या इतर भावंडांना मित्रांना प्रगतीच्या दिशेने वर खेचायला हेच शब्द तर बळ देतात .....नाही तर माणूस बिघडायला, हवेत जायला असा कितीसा वेळ लागतो!

 या पुस्तकातील प्रत्येक वाक्य नेटकं आणि नेमक अस  आहे. ते तळमळीने आणि प्रामाणिकपणानं लिहिलेलं दिसून येतं. लेखकानं केलेली वाटचाल त्यातील अडचणी वर केलेली मात या प्रक्रियेच सखोल विश्‍लेषण या पुस्तकात आहे. त्याबरोबरच न्यूनगंड व इंग्रजी विषयाची  असणारी भीती या दोन अत्यंत महत्त्वाच्या अडथळे, याबद्दल  सविस्तर मार्गदर्शन या पुस्तकात दिसून येतं. या पुस्तकांन जिद्द जगण्याचं व आत्मचैतन्य   जागविण्याच काम केल आहे. तरुणांच्या भल्यासाठी असलेल्या या अक्षर वारीचा उपयोग  प्रत्येकान आपल जीवन उन्नत करून घेण्यासाठी जरूर करावा.हे पुस्तक खूपच प्रेरणा देणार आहे.

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know