Thursday, December 30, 2021

पुस्तक नाव- फॉरेस्ट बाथिंग

वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य.
परिचय कर्ता नाव -  दिपाली जोशी
पुस्तक क्रमांक ५१
पुस्तक नाव- फॉरेस्ट बाथिंग
एकूण पृष्ठ संख्या -१७६
प्रकाशक  - my mirror publication

    मनुष्याला स्वतःची प्रगती कळते .. त्या सोबत होणारी निसर्गाची हानी ही कळते पण कळतं पण वळत नाही असं आहे. निसर्गाच्या सनिघ्यात राहिले की ताजेतवाने वाटते, उत्साह वाटतो हे आपण जाणतो पण त्याच झाडांच्या जपवणुकीसाठी काही करतो का हा मोठा प्रश्न. 

    हे पुस्तक म्हणजे निसर्ग आणि आरोग्य यांचे ऋणानुबंध उलगडून दाखवते.शहरी लोकांना छळणारे आजार, दुःख, वेदना या बहुतांश वेळा निसर्गाकडे पाठ फिरवल्यामुळे होतात. याचा अर्थ ज्या मातेने जन्म दिला तिच्यापासूनच पोरके होण्यासारखे आहे.डॉक्टरांनी दिलेल्या औषधांपेक्षा जंगलातील वास्तव्याने रुग्णांमध्ये अधिक सुधारणा होते..याचा अर्थ औषध न घेणे असा नाही पण सानिध्यता ही तितकीच महत्वाची आहे. 

   येथे शिनरिन योकु ही संकल्पना मांडली आहे. शिनरिन म्हणजे जंगल आणि योकु म्हणजे स्नान...हिरव्या रानातील स्नान ..म्हणजे हलकी फुलकी काम करत जंगलात मस्त भटकणे. झाडं, फुलं, पाकळ्यांचा सडा, गारवा , हिरवळ, पक्ष्यांचे आवाज, वारा या सर्वांचा आनंद घेणे. बहरलेली झाडं मनाची स्थिती एकदम बदलुन टाकतात.आपल्या आजूबाजूला एखादे फुलले फुल पाहिल्यावर किती आनंद होतो आपल्याला तर घनदाट वानाचा फेरफटका केला तरी कितीतरी मोठा सकारात्मक बदल होईल.निसर्ग एक प्रकारचे प्रशिक्षण केंद्र आहे आपली प्रसन्नता उत्तेजित करते. जसे चांगल्या लोकांच्या सानिध्यात राहिले की मन शांत होते तसे झाडाला मिठी मारली तर आपली मनातील बॅटरी चार्ज होते आणि सगळ्या चिंता ,तणाव दूर होतात.
सध्याचा बळावणार कॅन्सर तर जंगलात आपल्यापासून दूर पळून जातो. महान योगीं ना देखील वृक्षाच्या छायेत बसूनच आत्मज्ञान प्राप्त झाले. 

    सदर पुस्तकात प्राचीन गोष्टी ही आहेत आणि शास्त्रीय कारणेही आहेत. दोन्ही बाजूंनी निसर्ग सानिध्याचे पुरेपूर महत्त्व समजावले आहे... 

     मला एक परिच्छेद खूप आवडला तो असा...
" सजीवसृष्टीतील प्रत्येक प्राणिमात्राचे निसर्गाशी अतूट नाते आहे. हे सर्व सजीव आपले बहीण भाऊ आहेत. आपल्या आजूबाजूच्या वातावरणात जादू भरलेली आहे..ते फक्त अनुभवण्याची , समजून घेण्याची आपली कुवत हवी! " 

    दररोज नाही तर कमीतकमी शनिवार रविवार जरी आपण निसर्गाच्या सानिध्यात घालवले तर पुढचे पाच दिवस पुरेल एवढी एनर्जी निसर्ग आपल्याला देतो.  जंगलात कोणताच रस्ता सरळ नसतो , तिथे कशालाच अंत नसतो कारण तो अपूर्ण असतो म्हणूनच निखळ असतो, जेव्हा आपण अपूर्ण असतो तेव्हांच यशाची संधी आहे याची जाणीव आपणास होते. 

      अॅलन वँतस् यांनी म्हटल्याप्रमाणे,
"ज्याप्रमाणे पाण्याच्या लाटांचे कार्य म्हणजे समुद्राचे कार्य तसेच या विश्वातील घडामोडी सुरळीत चालण्यासाठी तुमचा सहभाग महत्वाचा आहे " 

@दिपाली जोशी

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know